प्रकाशदूत
माळमाथा भागात चोरट्यांचा धुमाकुळ
१५ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला
प्रकाशदूत
दाभाडी : मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील कळवाडीसह दहिवाळ, पाडळदे व चिंचगव्हाण गावांमध्ये पाच ते सहा जणांच्या टोळीने धाडसी घरफोडी तब्बल १५ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दुचाकीवरुन आलेले सहा संशयित कळवाडी येथील सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आंहेत.
ग्रामीण भागात ग्रामस्थ सध्या घराला कुलूप लावून घराच्या छतावर झोपत आहेत. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी या गावांमध्ये धुमाकूळ घातला आहे. अज्ञात चोरट्यांनी दहिवाळ येथील योगेश कदम यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गणेश बाबूलाल मते (रा. दहिवाळ) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल तसेच भाऊसाहेब नेरकर यांच्या घरातून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
पाडळदे येथील रणजित नरवाडे यांच्या घरातून ४ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास नेला. याशिवाय कळवाडी येथे दोन ते तीन घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दहिवाळ येथील योगेश कदम, चिंचगव्हाण येथील शिवसिंग पवार, भाऊसाहेब नेरकर व पाडळदे येथील रणजित नरवाडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Comments
Post a Comment